कोविडचा धोका टाळण्यासाठी जबाबदार नागरिक बना – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सर्व थरांतील नागरिकांना आवाहन
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
कोविडचा
धोका टळलेला नाही हे लक्षात घेऊन एक जबाबदार नागरिक म्हणून वागा असे आवाहन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ते आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना
परिसरात आयटी पार्कमध्ये उभारण्यात आलेल्या मुलांसाठीच्या कोविड काळजी
केंद्राचे लोकार्पण करताना बोलत होते.केवळ अर्थचक्र सुरळीतपणे सुरु राहावे म्हणून
आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत, हे विसरू नका. नागरिकांनी कोणत्याही चिथावणी आणि
आमिषास बळी पडून स्वत:च्या व इतरांच्या आरोग्यास धोका निर्माण करून घेऊ नये असे
आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की, कोविड काळात
राजकीय, सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्रम आयोजित करणे आपल्याला
आरोग्याच्या दृष्टीने फार महागात पडू शकते.मुख्यमंत्री म्हणाले की, पहिल्या
लाटेच्या शेवटी सणवार आले होते पण आता दुसरी लाट ओसरता ओसरता सण-उत्सवांची सुरुवात
होते आहे. त्यात आपण गेल्या पंधरा दिवसांपासून निर्बंध शिथिल केले आहेत, पण ही
मोकळीक आपले दैनंदिन पोटापाण्याचे व्यवसाय सुरु राहावेत, अर्थचक्र थांबू नये
म्हणून आहे. आपल्याला संसर्ग आणि मृत्यू दर आणखी कमी करायचा आहे. त्यामुळे कोविड
योद्धा होता आले नाही तरी निदान कोविडदूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार
नाही, याची खबरदारी घ्या.आज लोकार्पण होत असलेल्या कोविड काळजी केंद्राविषयी
समाधान व्यक्त करून ते म्हणाले की, तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांना संर्गाचा
धोका जास्त असल्याने राज्य शासनाने लहान मुलांसाठी कोविड टास्क फोर्स स्थापन केला
असून असा टास्क फोर्स स्थापन करणारे आपले पहिले राज्य आहे. मुंबईत आधुनिक अशी
जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा सुरु करण्यात आली असून त्या माध्यमातून
आपल्याला संसर्गाविषयी शास्त्रीयदृष्ट्या व्यवस्थित आणि त्वरेने माहिती मिळत राहील
असेही ते म्हणाले.आज लोकार्पण करण्यात आलेले कोविड काळजी केंद्र आमदार संजय पोतनीस
यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आले असून ते महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात
आले आहे.
No comments