राज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी – सहकार मंत्री बाळासाहेब पाटील
BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
राज्यात यावर्षी पणन विभागाने २१९.४९ लाख क्विंटल विक्रमी कापसाची खरेदी केली आहे. गेल्या
दहा वर्षातील ही विक्रमी कापूस खरेदी असल्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी
सांगितले.यासंदर्भात माहिती देताना सहकार मंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यात हंगाम २०१९-२० मध्ये ४४.३० लाख हेक्टर कापसाची
लागवड झाली. पर्जन्यमान सामान्य झाल्यामुळे कापसाचे विक्रमी पीक झाले. आंतरराष्ट्रीय
बाजारपेठेतील कापसाच्या दरामुळे देशाअंतर्गत व राज्या अंतर्गत कापसाचे दर हे कमी होत
गेले. शेतकऱ्यांना हमी दरापेक्षा कमी दराने
कापसाची विक्री करण्यांची वेळ येवू नये याकरीता राज्यात कापूस पणन महासंघाची नियुक्ती
सीसीआयचे सबएजंट म्हणून करण्यांत आली.
सर्वप्रथम राज्यामध्ये
४० कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले.सातत्याने कापसाचे पडणारे
दर तसेच कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव आणि वस्त्रोद्योगावर त्याच्या प्रभावामुळे बाजारपेठेमध्ये खाजगी खरेदीदारांची संख्या कमी होत गेली, असेही सहकार मंत्र्यांनी सांगितले.शेतकऱ्यांना
त्रास होऊ नये आणि कापूस खरेदीला विलंब होऊ नये यासाठी सीसीआय व कापूस पणन महासंघाद्वारे
अधिकचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय
राज्य शासनाने घेतला. कापूस पणन महासंघाद्वारे परिस्थितीनुरुप १२७ कापूस खरेदी केंद्र कोरोना पूर्वी सुरू करण्यात आली होती. कापूस पणन
महासंघाकडील पुरेसा सेवक वर्ग उपलब्ध नसल्याने अधिकचे खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी
आपत्कालीन परिस्थिती पाहून शासनाने कृषी विभागातील कृषी पदवीधर सेवकांची नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली आणि
नवीन कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.
No comments