आम्ही अनुभवलेली आगळी-वेगळी आषाढी वारी
BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
असं म्हणतात, ‘देवाची इच्छा असली तरच तुम्हाला त्याचं दर्शन
होतं’.. आमच्या बाबतीत हे तंतोतंत खरं ठरलं. ही माझी तशी दुसरी आषाढी वारी… सन २०१८
मध्ये आषाढी निमित्त पंढरपूरातच होतो, पण पुण्यात अचानक तत्कालिन मुख्यमंत्र्यांचा
कार्यक्रम असल्याने दशमीच्या रात्रीच पुण्याला परत निघावं लागलं होतं… श्री विठ्ठल
मंदिराच्या कळसाचं दर्शन घेऊन… पंढरपुरात येऊनही श्रींचं प्रत्यक्ष दर्शन न झाल्याची
रुखरुख मनात होतीच…सध्या कोरोना (कोविड-१९) विषाणू संसर्गजन्य परिस्थिती आहे. संपूर्ण
विश्वावर महामारीचं सावट आहे. ही परिस्थिती विचारात घेऊन आषाढी वारी पालखी सोहळा
नेहमीप्रमाणं पार पडणं शक्य नव्हतं. अनेकांना इच्छा असूनही वारीमध्ये सहभागी होता
आलं नाही. परिस्थितीमुळं घरात राहूनच पांडुरंगाचं दर्शन घ्यावं लागलं. परंपरेप्रमाणे
पालखी सोहळ्यात कोणताही खंड न पडता भक्तीभावानं तथापि, शासकीय नियमांचं पालन करुन
साजरा होणार होता. आषाढी यात्रा ही सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर येथे ‘महायात्रा’ म्हणूनही
ओळखली जाते. या वर्षी बुधवार १ जुलै, २०२० रोजी पहाटे २.२० वाजता राज्याचे मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे हे सपत्नीक श्रींची शासकीय महापूजा करणार असल्यानं शासकीय स्तरावर प्रसिद्धी
विषयक कार्यवाही करणं गरजेचं होतं.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर
मंदिर प्रवेशासाठी आरोग्यविषयक सर्वच खबरदारी घेण्यात येत होती. सोलापूरचे जिल्हा
माहिती अधिकारी रवींद्र राऊत आणि पंढरपूर उप माहिती कार्यालयाचे अविनाश गरगडे यांनी
आषाढी वारी वृत्तांकनासाठी येणाऱ्या सर्वांची ‘कोरोना’ चाचणी करणे बंधनकारक असल्याचं
कळवलं. त्यानुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी
यांनी पुण्याच्या ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठातांना पत्र पाठवून आमची
‘कोरोना चाचणी’ करण्याची विनंती केली. ‘ससून’चे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी
तातडीने कोरोना चाचणी केली. पुण्यामध्ये ९ मार्चपासून कोरोना वृत्तांकन करत असल्यानं
आमच्या सर्वांच्या मनात थोडी धाकधूक होतीच, पण सर्वांचीच चाचणी ‘निगेटिव्ह’आली.
दरम्यान, पुण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना वाहन प्रवेश पास बाबत
विनंती केली, त्यांनीही तातडीने वाहन पास उपलब्ध करुन दिले. आवश्यक ती पूर्वतयारी
झाल्यानंतर पुण्याहून दोन पथकं पंढरपूरकडं मार्गस्थ झाली. पथकामध्ये माहिती सहायक
संदीप राठोड, विलास कसबे, व्हिडीओ कॅमेरामन संजय गायकवाड, संतोष मोरे, छायाचित्रकार
नितीन सोनवणे, चंद्रकांत खंडागळे, सुनील झुंजार, जितेंद्र खंडागळे यांचा समावेश होता.
प्रत्येकाला आषाढी वारीचा पूर्वानुभव असल्यानं पंढरपूरपर्यंतचा मोकळा रस्ता पाहून
त्यांच्या गप्पांमध्ये वारी वृत्तांकनाच्या जुन्या आठवणींचाच समावेश होता.
ना टाळ-मृदुंगाचा गजर,
ना भागवत पताका घेतलेले वारकरी.. ना तुळशी डोक्यावर घेतलेल्या मायमाऊली.. ना विठूनामाचा
जयघोष… पूर्वी वारकऱ्यांच्या गर्दीमुळे वैताग वाटायचा, पण आता रस्त्यात कुठेही वारकरी
दिसत नाही… टाळ-वीणा-मृदुंगाच्या साथीनं ‘जय जय रामकृष्ण हरी’, ‘पुंडलीक वरदा हरी
विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराजकी जय’, असं कानावर पडत रहायचं… भक्तीरसाचा
महापूर पाहून आलेला वैताग क्षणात दूर व्हायचा… मन आनंदी, उल्हासित व्हायचं… आज मात्र
यापैकी काही अनुभवायला मिळालं नाही… म्हणून त्यांचं मन खट्टू होतं… पण त्याचवेळी
ही ‘आगळी-वेगळी वारी’ अनुभवायला मिळत असल्याचा एक वेगळाच आनंद होता… रस्त्यात ठिकठिकाणी
पोलीस चौक्या होत्या. मुख्यमंत्री हे वाहनानं
येणार असल्यानं योग्य ती दक्षता घेण्यात आली होती. परिसरातून कोणी वारकरी
पंढरपुरात येऊ नये, यासाठी प्रत्येक वाहनाची तपासणीही करण्यात येत होती. पोलीस प्रत्येकाशी
प्रेमानं आणि समजूतीनं बोलत होते. नेहमी असणारा ताण कोणाच्याही चेहऱ्यावर दिसत नव्हता.
No comments