BY - युवा महाराष्ट्र लाइव – मालेगाव |
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील मन्सुरा रुग्णालयातील तीन
कोरोनाबाधित रुग्ण हे उपचाराअंती कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना सुदृढ आरोग्याच्या
शुभेच्छा देवून आज घरी सोडण्यात आले, मालेगाव शहरातून प्रथमच एकाच वेळी तीन रुग्ण कोरोनामुक्त
झाल्याने नागरिकांचा आरोग्य प्रशासनावरील विश्वास वाढून नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल,
असा विश्वास कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.मन्सुरा हॉस्पिटलमधून
कोरोनामुक्त झालेल्या तीनही रुग्णांना आज घरी सोडण्यात आले त्यावेळी कृषिमंत्र्यांसह
महापौर ताहेरा शेख, उपमहापौर निलेश आहेर, सहायक जिल्हाधिकारी तथा घटना व्यवस्थापक डॉ.पंकज
आशिया यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम असून
रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक, परिचारिका, वॉर्डबॉय आदींसह इतर आरोग्य कर्मचारी अहोरात्र
मेहनत घेत आहेत. रुग्णालयातील सर्व रुग्णांची प्रकृती सुधारत असून, इतर सर्व कोरोना
रुग्णही या रुग्णांप्रमाणे लवकरच बरे होतील, असा विश्वास व्यक्त करत कृषिमंत्री श्री.भुसे
म्हणाले की, मालेगावमधील रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी वेळेवर रुग्ण दवाखान्यात
आले, तर त्यांना बरे करण्याची पूर्ण क्षमता आपल्या आरोग्य प्रशासनात आहे. त्यामुळे
नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता अथवा गैरसमज न ठेवता आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने
दवाखान्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले.मालेगाव येथील कोरोनामुक्त झालेले
हे रुग्ण अनुक्रमे ७ व ९ एप्रिल २०२० रोजी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर
तज्ज्ञ डॉक्टरांनी योग्य उपचार करुन त्यांना कोरोनामुक्त करण्यात मोठे यश संपादन केले
आहे. त्या रुग्णांच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर पुन्हा २४ तासानंतर
घेण्यात आलेल्या दुसऱ्या चाचणीतही त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आज ते कोरोनामुक्त
घोषित करुन घरी सोडण्यात आले. यात प्रामुख्याने मालेगाव येथील मदिनाबाद परिसरातील ३५वर्षीय
महिला व खुशामदपुरा परिसरातील ४५ वर्षीय महिला तर चांदवड येथील २७ वर्षाच्या पुरुषाचा
समावेश आहे.शहरातील रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सर्व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
निर्माण झाले होते. परंतू आज एकाच वेळी तीन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याच्या बातमीने काही
अंशी दिलासा मिळाला आहे. या यशाने हुरळून न जाता मोठ्या संख्येने दाखल रुग्णांमुळे
आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. आणि आपण याच प्रमाणे कसोटीने संपूर्ण जबाबदारी
पार पाडल्यास शहरातून कोरोनाला हद्दपार करण्यात नक्की यश मिळेल असे घटना व्यवस्थापक
डॉ.आशिया यांनी सांगितले. तर नागरिकांनी देखील प्रतिबंधात्मक आदेशाचे व प्रशासनाने
दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
Post a comment