BY -
युवा महाराष्ट्र लाइव – अहमदनगर |
मातंग समाजाची वर्गवारी करुन अ, ब, क, ड नुसार स्वतंत्र्य आरक्षण देण्यासह
समाजातील विविध मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने लहुजी वस्ताद साळवे व अण्णाभाऊ
साठे यांचा जयघोष करीत निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे, सचिव
संतोष शिंदे, कार्याध्यक्ष सुनिल सकट, जयवंत गायकवाड, वसंत अवचीते, अशोक चव्हाण, संतोष
उमाप, चंदर चव्हाण, संपत गोरखे, समा चव्हाण, लक्ष्मण साळवे, भिमराव उल्हारे, आबासाहेब
तोरडमल आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मातंग समाज हा महाराष्ट्रासह संपुर्ण
देशात वास्तव्यास आहे. या समाजातील बहुतांशी नागरिक भूमीहीन असून, मोलमजुरी करून आपले
जीवन जगत आहे. उच्च शिक्षणापासून हा समाज वंचित आहे. तसेच शासकीय सेवेत देखील या समाजातील
युवकांची संख्या अत्यंत अल्प असून शासनाने त्यांच्या मागण्या व प्रश्न सोडवून त्यांना
समाजाच्या प्रवाहात आनण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
मातंग समाजास अ,ब,क,ड अनुसार वर्गवारी
करून स्वतंत्र आरक्षण त्वरित लागू करावे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर
भारतरत्न पुरस्कार द्यावा, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी (जि.
पुणे) येथे भव्य स्मारक उभे करावे, मुंबई विद्यापिठास साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे
नाव द्यावे,
गंजपेठ पुणे येथील देशातील पहिली व्यायाम शाळा सुरू
करून तेथे अनेक क्रांतिकारक घडविणार्या लहुजी वस्ताद यांच्या क्रांती शाळेस लहुजी
वस्ताद साळवे यांचे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, लहुजी वस्ताद साळवे अभ्यास
आयोग त्वरित कार्यान्वित करुन, त्यांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत समाविष्ट करावे,
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळातर्फे थेट कर्ज प्रकरण त्वरित सुरु करावे, अण्णाभाऊ
साठे महामंडळाचे थकीत कर्ज माफ करण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात
आली आहे. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देण्यात आले.
सदर मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांनी हिवाळी
अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर नागपूर येथील विधान मंडळासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे.
या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी संपुर्ण राज्यात निदर्शने, धरणे आंदोलन व निवेदन देऊन
शासनाचे लक्ष वेधण्यात येत आहे.
Post a comment